https://sanatanprabhat.org/marathi/148407.html
सीमेवर कर्तव्य बजावत असतांना अनेकदा दैवी शक्तीचे प्रत्यंतर आले ! – लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर
May 11, 2018
प्रतिकूल स्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणार्या सैनिकांचा अभिमान बाळगा !
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर
पुणे, १० मे (वार्ता.) – आयुष्यात परिश्रमाएवढाच दैवी शक्तीचाही महत्त्वाचा वाटा आहे. सीमेवर कर्तव्य बजावतांना मी अनेकदा त्याचा अनुभव घेतला. माझे मित्र मला म्हणायचे, ‘देव तारी त्याला कोण मारी ?’ दैव बलवत्तर असेल, तर शत्रू काही करू शकत नाही, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले. ‘युद्धस्य कथा रम्या:’ असे म्हणतात. याचे प्रत्यंतर राजेंद्र निंभोरकर यांच्या व्याख्यानाच्या वेळी आले. अनेक प्रसंग कथन करून त्यांनी सीमेवरचे चित्र डोळ्यांसमोर आणले. दैवी शक्तीचे सामर्थ्य, आंतरिक अनामिक जाणीव (सिक्स्थ सेन्स), सैनिकांमध्ये असलेले आपुलकीचे नाते असे अनेक पैलू त्यांनी उलगडले. ‘पुढचा जन्म मिळाला, तर पुन्हा सैनिक होऊनच देशाची सेवा करायची आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीच्या वतीने नुकतेचा बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘शूरा मी वंदिले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनेंस लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा त्यांच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निंभोरकर यांच्या निवृत्तीचा तो आदला दिवस होता.
राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत…
छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आमच्या गावात एस्.टी., वीज अशा सुविधा नव्हत्या. थोडेफार शिक्षण झाल्यानंतर शेती करायची, असे ठरले होते; पण आमच्या शाळेतील एका शिक्षकांनी सातारा सैनिक शाळेचे एक परिपत्रक माझ्या वडिलांना दाखवले. त्यानंतर मी सातारा येथील सैनिक शाळेत प्रवेश घेतला आणि माझा पुढचा प्रवास चालू झाला. एका छोट्याशा खेडेगावातून येऊन सैन्यात मोठ्या पदावर पोहोचणे, हा पहिला दैवी अनुभव !
भूतान सीमेवरील डोंगर कोसळल्यावर आलेला भीषण अनुभव !
भूतान सीमेवरच्या एका छोट्या गावात एकदा आमची तुकडी गस्त घालत होती. त्या वेळी मी ‘सेकंड लेफ्टनंट’ म्हणून काम करत होतो. जूनच्या सुमारास तेथे पुष्कळ पाऊस असतो. गस्त घालतांना गावात गेलो. तेथे आम्ही जेवण केले आणि पुढच्या कामासाठी पर्वत चालू लागलो आणि १०-१५ मिनिटांतच आमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण डोंगरच कोसळला आणि गावच भुईसपाट झाले. १५ मिनिटांपूर्वी आम्ही ते गाव सोडले होते. आम्ही सर्व जण थोडक्यात वाचलो. सर्व गाव ढिगार्याखाली गेल्याचे पाहून आम्ही पुन्हा खाली आलो आणि लोकांना साहाय्य करू लागलो.
तेवढ्यात आमचे लक्ष एका कठीण परिस्थितीत अडकलेल्या एका लहान मुलीकडे गेले. ती अशा ठिकाणी अडकली होती की, तिला वाचवण्यासाठी तेथे जायला कोणता रस्ता आणि पायवाट नव्हती. डोंगर चढून आणि नंतर उतरून तिच्यापर्यंत पोहोचायचे म्हटले, तर ८-९ घंटे लागले असते. ती मुलगी ‘वाचवा, वाचवा’ असे म्हणत होती; पण तिला वाचवण्यासारखी परिस्थिती नव्हती. आमच्या तुकडीतील एका शीख सैनिकाने मला विचारले, ‘सर, तिला वाचवायचे का ?’; पण परिस्थिती अत्यंत अवघड असल्याने मी म्हणालो, ‘ते शक्य नाही. आपण पुढच्या मार्गावर जाऊ’; पण तो शीख सैनिक म्हणाला, ‘साहब, उस बच्ची को छोड के जाने का दिल नही करता । मै उसे बचाने की कोशिश करता हू ।’ मी म्हटले, ‘ठीक आहे.’ शीख सैनिकाने मग ‘अँकर’ने ‘रोप’ फिक्स केला. तो तिच्यापर्यंत पोहोचला. त्या लहान मुलीला खाली घेतले; मात्र खाली येतांना एका क्षणी दोरखंडावर भार अधिक झाला आणि तो तुटला. ती मुलगी आमच्यापर्यंत पोहोचली; पण तो सैनिक गेला. त्या वेळी मला वाटले, ‘एवढे करण्याची आवश्यकता होती का ?’; पण आज या प्रसंगाकडे मागे वळून पहातांना वाटते की, त्या सैनिकाने देशातील नागरिकांचा जीव वाचवण्याचे त्याचे कर्तव्य निभावले. (अशीच कर्तव्यनिष्ठा देशातील सर्व नागरिकांमध्ये निर्माण झाली, तर देश वैभवाच्या शिखरावर जायला किती वेळ लागेल ? – संपादक) ‘आपले आयुष्य आपल्या अधीन कि देवाच्या अधीन’, असे त्या वेळी वाटले.
सीमेवरील ‘पोस्ट’ टिकवून ठेवण्यासाठी सैनिकांनी अनुभवलेली प्रतिकूलता !
सीमेवर एका ठिकाणी अन्य कुणाची ‘पोस्ट’ आहे का, ते पहाण्यास आणि नसल्यास आपली पोस्ट उभी करण्यास एकदा आम्हाला वरिष्ठांनी सांगितले. त्यानुसार आम्ही गेलो. तेथे जायला आम्हाला दोन दिवस लागले. प्रत्येकाच्या पाठीवर २५-३० किलो वजन होते. लपत-छपत आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी चाललो होतो. आम्हाला तेथे पोहोचण्यास वेळ लागत होता. दुसर्याच दिवशी आमच्याकडचे पाणी संपले. आम्हाला जी पोस्ट सर करायची होती, ती अजून पुष्कळ दूर होती. माणून अन्नाविना राहू शकतो; पण पाण्यविना कसा रहाणार ? पाण्याविनाच मोहीम करत राहिलो, तर अर्धे सैनिक पाण्याविनाच मरून गेले असते. आता काय करायचे ? या विवंचनेत असतांनाच आम्हाला एका सैनिकाने एक युक्ती सांगितली. ‘एका भांड्यामध्ये एका सैनिकाने मूत्रविसर्जन केले आणि ते तो प्यायला.’ जिवंत रहायचे असेल आणि ‘पोस्ट’ बनवायची असेल, तर तसे करणे भागच होते; मग आम्हीही त्याप्रमाणेच करून स्वतःला जिवंत ठेवले. नियोजित स्थळी पोहोचून ती ‘पोस्ट’ घेतली. आजही ती ‘पोस्ट’ भारताकडे आहे.
अशी केली शत्रूची दिशाभूल !
एक पोस्ट काबीज करतांना ५ सप्टेंबर १९८८ या दिवशी पुढच्या बाजूने गोळीबार चालू झाला. त्यात एक सैनिक घायाळ झाला. तो तीव्र उताराचा पहाडी भाग होता. घायाळ झालेला सैनिक हलूही शकत नव्हता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी दुसरीकडे घेऊन जायचे म्हटले, तर शत्रूचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आम्ही शत्रूची दिशाभूल करण्यासाठी दुसर्या बाजूने पळत जायचे ठरवले. पळतांना शत्रूचे लक्ष आमच्यावर केंद्रीत होईल आणि तेवढ्या वेळात घायाळ सैनिक बंकरच्या मागे जाईल, असा आम्ही विचार केला. प्रारंभी आमचा रेडियो ऑपरेटर पळाला आणि नंतर मी पळालो. पाकिस्तान्यांनी आमच्यावर गोळीबार चालू केला. आमच्या गटात सगळे सरदार होते. ते पगडी बांधायचे. मी पगडी घालत नव्हतो आणि हेल्मेटही घालत नव्हतो; पण त्या दिवशी मनात हेल्मेट घालण्याचा विचार आला. मी हेल्मेट घातलेले होते आणि मी जेव्हा पळत होतो, तेव्हा एका खडकाच्या मागे जाणार, तेवढ्यात एक गोळी हेल्मेटला लागली. ते हेल्मेट अजूनही माझ्याकडे आहे. हा पुन्हा दैवयोगाचाच भाग होता.
दैव आणि नशीब कसे बलवत्तर असते, याची आलेली प्रचीती !
वर्ष १९९२ ते १९९४ मध्ये काश्मीरमध्ये बारामुल्ला भागात माझी पोस्टिंग असतांना तेथे सातत्याने ऑपरेशन्स व्हायची. जवळपास प्रतिदिनच कुठे ना कुठे ऑपरेशन व्हायचे. त्या वेळी जवळपास ४३ आतंकवादी आम्ही मारले होते आणि आतंकवाद्यांची चळवळ जवळपास पूर्णपणे मोडीत काढली होती. त्यामुळे आतंकवादी माझ्यावर चिडून होते. त्यांनी मला संपवायचा विडा उचलला होता. तशा धमक्याही त्यांनी दिल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला संपवायचेच नियोजन केले होते. आतंकवाद्यांनी आम्ही नेहमी कोणत्या रस्त्याने जायचो, याचा अभ्यास केला. त्या दिवशी ऑपरेशन करून परत जात असतांना ‘नेहमीच्या मार्गाने न जाता जंगलातील एका दुसर्या मार्गाने जावे’, असे मला त्या दिवशी वाटले. दुसर्या मार्गाने जाण्यास ३ ते ४ घंटे अधिक वेळ लागणार होता; तरीही मला आतून दुसर्या मार्गाने जावे, असे वाटत होते. त्यामुळे आमची बटालियन दुसर्या मार्गाने गेली आणि दुसरी एक बटालियन नेहमीच्या मार्गाने गेली. त्या बटालियनवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. आम्ही दुसर्या मार्गाने गेल्याने आम्ही वाचलो; पण आमचे सहकारी गेले. दोन वर्षांत मी एकदाही आतंकवाद्यांच्या हाती लागलो नाही.
आपुलकी आणि जिव्हाळा जपणारे भारतीय सैनिक !
भारतीय सैनिकांमध्ये जी आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना आहे. ती अन्य कुणा सैनिकांमध्ये असेल, असे मला वाटत नाही. एकप्रकारचे नाते सैनिकांमध्ये निर्माण होते. एकदा मोहिमेवर असतांना पाण्याचा पुष्कळच तुटवटा होतो. २-२ मास आम्ही आंघोळ केली नव्हती. कपडे धुतले नव्हते. केवळ पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होते. आम्ही आदिवास्यांसारखे झालो होतो. एक दिवस आमच्या तुकडीतील एक सैनिक माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘साहेब, आमचा तुमच्यासाठी एक हुकूम आहे. पलीकडे खडकाच्या मागे बादलीभर पाणी ठेवले आहे. तेथे जा आणि आंघोळ करून घ्या.’ ते पाहून मी म्हटलो, ‘बादलीभर पाणी म्हणजे सर्व सैनिकांसाठी १०-१५ दिवस पुरेल, एवढे पाणी ! ते आंघोळ करून कशाला वाया घालवायचे ?;’ पण सैनिकांनी आग्रह केला. अशा प्रकारे अधिकारी आणि सैनिक यांच्यामध्ये एक आदराचे, आपुलकीचे नाते असते.
नैतिक मूल्ये जपणारे भारतीय सैनिक !
एका ऑपरेशनच्या वेळी माझ्या गटातील एका सैनिकाचा सुरुंगावर पाय पडून त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले की, या सैनिकाचा पाय कापावा लागेल. पाय कापला नाही, तर पूर्ण शरिराला गँगरीन होऊन त्याचा मृत्यू होईल; पण सैनिक काही पाय कापायला सिद्ध होत नव्हता. आधुनिक वैद्यांनी मला संपर्क केला. ते म्हणाले, सैनिक वाचवायचा असेल, तर त्याचा पाय कापावा लागेल; सैनिक सिद्ध नाही. तो म्हणतो, आमच्या सरांशी बोला. मी आधुनिक वैद्यांना विचारले, ‘मी काय करू ?’ आधुनिक वैद्य म्हणाले, ‘तुम्ही एकदा सैनिकाशी बोला. सैनिक जोपर्यंत ऑपरेशन करण्याचे लिहून देत नाही, तोपर्यंत आम्ही पुढे नाही जाऊ शकत.’ मी सैनिकाशी बोललो, ‘शस्त्रकर्म करून तुझा पाय कापावा लागेल; अन्यथा तुझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे शस्त्रकर्म व्हायला हवे.’ त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही सांगत आहात, तर ठीक आहे.’ सैनिकाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी त्याला भेटायला गेल्यावर विचारले, ‘‘अरे, तुला सगळे आधुनिक वैद्य शस्त्रकर्म करण्याचे सांगत असतांना तू ऐकले नाहीस; पण मी सांगितल्यावर मात्र ऐकले. असे कसे काय ?’’ त्यावर त्या सैनिकाने उत्तर दिले, ‘‘सर, तुम्ही आमचे वरिष्ठ आहात. माझे वडीलही सैन्यात होते. त्यांनी मला एक शिकवण दिली. ते म्हणाले, आपल्या वरिष्ठांच्या ज्या आज्ञा असतील, त्या पाळायच्या; भले जिवाचे बरे-वाईट का होईना.’’
सांगायचा उद्देश, काही लोक म्हणतात, सैनिकांमध्ये असंतोष आहे. खदखद आहे; पण तसे काही नाही. जोपर्यंत नैतिक मूल्ये आहेत, तोपर्यंत सर्व चांगले आहे.
आतंकवाद्यांच्या आक्रमणापासून देवाने केलेले रक्षण !
दक्षिण काश्मीर भागातून एकदा सगळे काम झाल्यानंतर मी ११.३० वाजता विमानतळावरून दुसर्या ठिकाणी जाणार होतो; पण त्या दिवशी वाटले, ‘थोडे लवकरच निघावे आणि अन्य काम करावे.’ त्यामुळे मी ११.३० च्या ऐवजी ९.३० वाजता निघालो आणि नंतर मला कळले, मी जेथून निघणार होते, त्या ठिकाणावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. आपले सगळे सैनिक सिद्ध असल्याने आपण ते आक्रमण परतवून लावले. आपली फारशी हानी झाली नाही. माझा मित्र त्यानंतर मला म्हणाला, ‘देव तारी त्याला कोण मारी’ !
मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचा प्रसंग !
कारगिल युद्ध चालू असतांना एकदा आपल्याला काहीच यश मिळत नव्हते. आम्हाला एकदा लक्ष्य मिळाले. शत्रूची पोस्ट उद्ध्वस्त करून यायची होती. त्याप्रमाणे आम्ही ती केली; पण तेथून परत येतांना मला बॉम्बचे स्प्रिंटर लागले. तेव्हा मला वाटले, आपण आता काही वाचू शकत नाही. सैनिकांनी मला उचलून जीपमध्ये ठेवले. त्या क्षणी तेथे बॉम्ब पडला. जीपचा चालक गंभीररित्या घायाळ झाला. सैनिकांनी मला उचलून दुसर्या जीपमध्ये ठेवले आणि वैद्यकीय उपचारांसाठी पाठवले. त्या दिवशी असे वाटत होते की, कुणी तरी मला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी शुद्ध तेव्हा हरपत चालली होती.
आधुनिक वैद्यांना विचारले, ‘‘मी अजून किती काळ जिवंत आहे सांग.’’ आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘सर, तुम्हाला काही होणार नाही’’; पण प्रत्यक्षात मला सगळे चित्र दिसत होते. तेव्हा मी शांत होतो. आधुनिक वैद्यांना म्हणालो, ‘‘अहो, मोकळेपणाने मला खरे काय ते सांगा. जर मी मरणार असेन, तर मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत.’’ आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘सर, आपण प्रयत्न करू.’’ लहानपणापासूनचा सगळा भूतकाळ एका ‘फ्लॅशबॅक’सारखा डोळ्यांसमोर तरळून गेला. बायका-मुलांचे काय होणार, याची किंचित काळजी वाटली; पण नंतर विचार आला, ‘जेव्हा जे व्हायचे असेल, ते होईल.’ मी आधुनिक वैद्यांना सांगितले, ‘‘समजा मी गेलो, तर माझ्या बायका-मुलांना निरोप द्या. मी खुश आहे. I have no regrets.’’ पुढे मी वाचलो. पुन्हा दैवाचे प्रत्यंतर ! नंतर असे वाटले की, मी मृत्यूच्या दाढेतून परत आलो आहे. आता जे काही मिळाले आहे, ते बोनस आयुष्य आहे. आता घाबरायचे नाही. जे काही योग्य आहे, ते करत रहायचे. मी सगळे आता बोनस म्हणूनच घेतो.
प्रतिकूल प्रसंगातही खंबीर रहाणारी सैनिकाची पत्नी !
एकदा एका ऑपरेशनच्या वेळी एका सैनिकाचा पाय गेला. तो लंगडा झाला. त्याचे त्याला पुष्कळ वाईट वाटत होते; त्याच वेळी त्याचे लग्नही ठरले होते; पण आता पाय गेल्यानंतर कोण त्याच्याशी लग्न करणार, म्हणून त्याला वाईट वाटत होते. पण त्याचे ठरलेल्या मुलीशीच लग्न झाले. लग्न झाल्यानंतर ते मला भेटायला आले. मी नववधूला विचारले, ‘बेटी, ये तो लंगडा हो गया था. फिर भी तुने शादी की !’ त्यावर ती शीख मुलगी म्हणाली, ‘साहब, ये अपने आप तो लंगडा नही हुवा. और अगर शादी के बाद लंगडा होता, तो क्या मै इसको छोड देती !’ हे उत्तर ऐकून मी म्हणलो, ‘बेटी, तुझे सलाम !’ अशा महिलांमुळेच सैनिकांचे मनोधैर्य टिकून रहाते.
दारूगोळा अल्प असल्यास सैनिकाला निर्णयाधिकार असतात !
‘दारूगोळ्याच्या (अॅम्युनेशन) संदर्भात पारदर्शकता आणि स्वयंपूर्णता आणता येईल का ?’ या प्रश्नाला उत्तर देतांना श्री. निंभोरकर म्हणाले, ‘अनेक अभ्यासक, विश्लेषक युद्धाला आपण सिद्ध नाही, असे नकारात्मकरित्या सांगतात. सप्टेंबरमध्ये तशी थोडी स्थिती होती; पण सध्या २-३ गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. ११ सहस्र ५०० कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मी साईन केले. आपल्याकडे १० दिवस पुरेल एवढे अॅम्युनेशन आहे. त्यापेक्षा साठा अल्प असेल, तर सरकारकडे येण्याची आवश्यकता नाही. सैन्याला ते निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.’
श्री. राजेंद्र निंभोरकर यांचा निगर्वीपणा
‘सर्जिकल स्ट्राईक हे नाव कुणी दिले ?’, ‘सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुखांना बातमी कुणी आणि कशी कळवली ?’, ‘अमेरिका, रशिया, चीन यांचा दबाव कसा हाताळला ?’, यांसारख्या प्रश्नांना त्यांनी प्रांजळपणे ‘याविषयी माहीत नाही. आमचे शिपाईचे काम ! जे काम देतील, ते पूर्ण करायचे, असे उत्तर दिले.’
Categories राष्ट्र-धर्म